आमचा होमस्कुलिंगचा प्रवास - भाग ४
परीक्षा हे आपल्या शिक्षणव्यवस्थेने व समाजाने स्वीकारलेले मूल्यमापनाचे एक साधन आहे. त्यामुळे परीक्षा, मार्क यांचा शिकण्याच्या प्रक्रियेशी काडीचाही संबंध नाही, परीक्षेशिवाय, खरं तर परीक्षा नसतील तरच मुले मनापासून शिकतात, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे म्हणूनच डॉक्टर यशपाल यांच्या समितीने आठवीपर्यंत परीक्षा ही मूल्यमापनाची पद्धत रद्द करत सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापनाची पद्धत रूढ करायचा प्रयत्न केला. सोशल मीडियावर टाकायला आणि नातेवाईकांना दाखवायला मार्कलिस्ट मिळण्याची बंद झाल्याने पालकांनी हा प्रयत्न हाणून पाडला! असो.
होमस्कुलिंग करणाऱ्या मुलांना परीक्षा हे मूल्यमापनाचे साधन वापरत येते का? तर हो येते. शाळेत मुले दरवर्षी परीक्षा देतात मात्र होमस्कुलिंग करत असताना जर तुम्ही महाराष्ट्र मुक्त शिक्षण बोर्डात प्रवेश घेतला तर तुम्ही पाचवी व आठवीची परीक्षा व नंतर दहावीची परीक्षा देऊ शकता. या परीक्षा सर्व विद्यापीठांमध्ये ग्राह्य धरल्या जातात. जर तुम्हाला केवळ पाचवी व आठवीची परीक्षा देण्याऐवजी पहिलीपासून परीक्षा द्यायची असेल तर तुम्ही एनआयओएस कडून पहिली ते तिसरी साठी लेव्हल A, चौथी,पाचवी साठी लेव्हल B व सहावी ते आठवीसाठी लेव्हल C ला प्रवेश घेऊन परीक्षा देऊ शकता व नंतर दहावी व बारावीची परीक्षा देऊ शकता.
एनआयओएसला तुम्ही वर्षभरात कधीही प्रवेश घेऊ शकता व कधीही परीक्षा देऊ शकता. महाराष्ट्र मुक्त शिक्षण बोर्ड असो किंवा एनआयओएस असो यांनी स्वतःचे अभ्यासक्रम तयार केले आहेत. हे अभ्यासक्रम राष्ट्रीय शिक्षण आराखड्याशी मिळतेजुळते असतात. अर्थातच त्यांचा भर हा शिक्षणाचा जीवनाशी जोडण्यावर असतो.
त्यामुळे मुले शाळेत जसं भूगोल, इतिहास, विज्ञान, भाषा व गणित शिकतात तसेच ते होमस्कुलिंग करताना सुद्धा शिकू शकतात. हे विषय शिकण्यासाठी एनआयओएसचे प्रचंड प्रमाणात स्टडी मटेरियल ऑनलाईन उपलब्ध आहे, त्याचबरोबर तुम्ही निवडलेल्या स्टडी सेंटरला मुलांच्या शंका थेट भेटून निरसन करता येतात. दहावीनंतर तुम्हाला कुठे जायचे आहे याचा विचार करून तुम्ही विषय निवडू शकता व त्या विषयांचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन साधने वापरून मुलांच्या कलाने व गतीने अभ्यास करून परीक्षा देऊ शकता. त्यांनी दिलेल्या स्टडी सेंटरला जाऊन तुम्ही प्रयोगशाळा देखील वापरू शकता. तसेच खाजगी प्रयोगशाळा, ग्रंथालये यांचा उपयोगसुद्धा तुम्ही करू शकता.
त्याचबरोबर गणित, विज्ञान, इतिहास या क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या सरकारी व खाजगी संस्था आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही काम करू शकता, खान एकादमी, एडेक्स, कोर्सेरा सारखे मुलांना आवडणारे प्लॅटफॉर्म वापरून तुम्ही थेट हार्वर्ड, एमआयटी, स्टॅनफर्ड सारख्या विद्यापीठांकडून मोफत शिकून तुम्हाला आवडणारा विषय सगळ्या बाजूनी समजून घेऊ शकता.
एनआयओएस मधून परीक्षा देऊन तुम्ही भारतातील व विदेशातील जवळपास सगळ्या विद्यापीठात अगदी आयआयटी, मेडिकल व डेंटलला सुद्धा प्रवेश घेऊ शकता. अर्थातच त्यासाठी तुम्हाला योग्य विषयांची निवड करावी लागते. याविषयी सगळी माहिती एनआयओएसच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
दुसरा प्रश्न सोशलायजेशनचा, हा प्रश्न विचारण्याआधी शाळा सुरु होण्यापूर्वी होत होते का नव्हते आणि सोशलायजेशन हे बंदिस्त वातावरणात, कुणाच्या देखरेखीखाली चांगले होईल की मुक्त वातावरणात? या दोन गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. शाळा जेमतेम दोनशे वर्षांपूर्वी सुरु झाल्या. त्याच्या अशी मुले चारभिंतीच्या बाहेर अनेक गोष्टी शिकत होती. सगळ्यात महत्वाचे म्हणजे शाळा सुरु झाल्यापासून मुलं फक्त त्याच्या वयाच्या मुलांबरोबरच जास्त वेळ राहू लागली. त्यामुळे मोठ्या मुलांकडून प्रेरणा घेऊन शिकणे आणि लहान मुलांना सांभाळताना जबाबदारीची जाणीव शिकणे या सोशलायजेशनच्या अत्यंत महत्वाच्या अंगाला आपण मुकलो.
होमस्कुलिंग करत असताना शाळेची मर्यादा नसल्याने मुले केवळ त्यांच्या वर्गातील नाही तर जगातील कोणत्याही मुलाशी थेट संपर्क करून मैत्री करू शकतात, स्नेहसुद्धा अशाच एका गटाचा सदस्य आहे ज्यामध्ये जवळपास तीस देशातील वेगवेगळ्या वयाची मुले एकत्र येतात, कधी एकत्र शिकतात तर कधी एकत्र मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करता. त्याचबरोबर भारतातील जवळपास प्रत्यक्ष शहरात होमस्कुलिंग करणाऱ्या पालकांचे गट आहेत, जे मुलांना एकत्र येण्याच्या अनेक संधी उपलब्ध करून देतात.

तसेच मुलांकडे भरपूर वेळ असल्याने ते इतर मुले शाळेत असताना नेहमी जी गर्दीची ठिकाणे असतात ती रिकामी असल्याने ग्रंथालये, संग्रहालये, नेहरू तारांगण सारख्या संस्थांमध्ये जाऊन अनेक ताई दादांशी मैत्री करतात.त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांना त्यांच्याच वयाच्या व त्याच त्या मुलांशी मिसळून त्यालाच सोशलायजेशन म्हणायची वेळ येते तशी होमस्कुलिंग करणाऱ्या मुलांवर येत नाही!
अर्थातच सोशलायजेशनचा या दृष्टिकोनातून विचार न झाल्याने होमस्कुलिंगला सुरुवात करण्याआधी पालकांना भीती वाटणे साहजिक आहे. मात्र पहिल्या दोन महिन्यातच सोशलायजेशनच्या या अंगाची अनुभूती आल्याने पालक बिनधास्त होतात असा आमचा अनुभव आहे.
त्याचबरोबर विनाकारण पुढे जायची घाई नसल्याने संविधानाने सांगितलेले सगळे नियम, जबाबदाऱ्या ही मुले अगदीसहज पाळतात. जबाबदारी व स्वातंत्र्य या गोष्टी आचरणात आणण्याची मुभा असल्याने त्याचा सराव व सवय असल्याने ही मुले लौकिक अर्थाने संविधान शिकत नसली तरी संविधान जगतात आणि म्हणूनच समाजात वावरताना एक जबाबदार नागरिक म्हणून वावरतात.
क्रमश:
चेतन एरंडे
Comments
Post a Comment