Skip to main content

होमस्कुलिंग व परीक्षा - भाग - २





वयानुसार मुल पुढच्या इयत्तेत जात असताना त्याच्या केवळ बौद्धिक नाही तर शारीरिक व मानसिक क्षमता देखील विकसित झाल्या आहेत किंवा नाही याचे तीन तासात "फ्लॅश मूल्यमापन" न करता जर त्या मुलाचे सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन झाले, तर आणि तरच  आपण त्या मुलाला व शिकण्याच्या एकूण प्रक्रियेला न्याय देऊ शकतो.

२००५ साली सादर झालेल्या राष्ट्रीय शिक्षण आराखड्यामध्ये प्रसिद्ध शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ डॉक्टर यशपाल व त्यांच्या टीमने सुद्धा हाच विचार मांडला. शाळांमधून परीक्षार्थी नव्हे तर विद्यार्थी तयार व्हावेत म्हणून सर्व शिक्षण हक्क कायद्याने पहिली ते आठवी पर्यंतची परीक्षा ही प्रचलित मूल्यमापनाची पद्धत बंद करून सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापनाचा आग्रह धरत, पास व नापास अशी विभागणी न करता मुलांना तणावरहित शिक्षणाची संधी दिली. मात्र असे "शास्त्रीय व नैसर्गिक मूल्यमापन" ग्लॅमरस नसल्यामुळे म्हणा किंवा पालक व शिक्षक या दोघांनाही "सतत कामाला लावणारे" असल्यामुळे म्हणा, किंवा माझा मुलगा तुमच्या मुलापेक्षा हुशार आहे हा टेंभा मिरवायचे शस्त्रच  हातातून गेल्यामुळे म्हणा पालक व शिक्षक यांनी सरकारवर दबाव आणून, २०१७ सालापासून पुन्हा एकदा परीक्षारुपी अनैसर्गिक मूल्यमापनाची पद्धत सुरु करायला लावली.

असो. आम्ही होमस्कुलिंग करत असताना स्नेहने परीक्षा द्यायची का नाही आणि द्यायची असेल तर कुठे जाऊन द्यायची, याचा अनेक वेळा विचार केला. कधी एखादी सरकारी शाळा, तर कधी NIOS यांच्या माध्यमातून त्याने परीक्षा द्यावी, जेणेकरून त्याला कधी परत शाळेत जावेसे वाटले किंवा इतर उच्च शिक्षण घेताना परीक्षेचा पुरावा द्यावा लागला, तर कसलीही अडचण येणार नाही. मात्र मागच्या तीन वर्षात स्नेह्चा स्वशिक्षणाचा प्रवास जसा जसा पुढे सरकत गेला, तशी  "त्याने परीक्षा दिलीच पाहिजे", अशी आमची अधून मधून उफाळून येणारी उर्मी कमी कमी होत गेली, त्यामुळे मागच्या तीन वर्षात स्नेहने एकही परीक्षा दिलेली नाही!

स्नेह्ने एकही परीक्षा दिली नाही, याचा अर्थ त्याच्या शिकण्याचे मूल्यमापन आम्ही केलेच नाही असे नाही. कारण आमच्यासाठी त्याच्या शिकण्याचे मूल्यमापन जितके महत्वाचे आहे, तितकेच त्याला स्वत:हून शिकत असताना आम्ही त्याला जी मदत करतो त्याचे व स्वशिक्षण या शिक्षण पद्धतीचे सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन होणे गरजेचे होते व आहे.

स्नेहच्या मूल्यमापनाची कसोटी ही तीन तासाची परीक्षा नसेल, हे तर पक्के ठरले होते, त्यामुळे मूल्यमापन कसे करावे, याचा विचार करत असताना, आम्हाला इंटरनेटवर "सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या" इयत्तेनुसार काय कसोट्या असतात, हे सांगणारी एक सरकारी पुस्तिका मिळाली.  त्याचबरोबर, त्याच्या वयानुसार भावनिक व शारीरिक क्षमता काय असल्या पाहिजेत, याचा अंदाज देणारे काही तक्ते आम्हाला इंटरनेटवर मिळाले. या सगळ्याचा उपयोग करत, आम्ही त्याच्या क्षमता तपासून बघू लागलो व जिथे गरज पडेल, तिथे आमच्यात काही बदल करत, त्याला त्याच्या गतीने व कलाने क्षमता विकसित करण्याची संधी देण्याचा प्रयत्न करत गेलो.

या सगळ्या प्रक्रियेमध्ये, त्याला क्षमता आत्मसात करताना काही अडचण येत असेल, तर तो त्याचा दोष आहे असे न मानता, आमच्याकडून काही चुकते आहे का, आम्हाला बदलण्याची गरज आहे का, हे तपासत राहिलो, व जिथे गरज पडेल तिथे, "आम्ही सांगतोय तेच ब्रम्हवाक्य आहे"  असे न समजता, स्वत:मध्ये  आवश्यक तिथे बदल करत गेलो. आपले आई बाबा बदलत आहेत, हे बघून, स्नेह सुद्धा त्याच्यामध्ये सकारात्मक व आवश्यक बदल करत, मागे पडत असलेल्या क्षमता आत्मसात करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करू लागला.

स्नेहचे मूल्यमापन करत असताना आमच्या लक्षात आले की, इयत्तेनुसार आवश्यक असलेल्या काही विषयांच्या बौद्धिक क्षमता तो अगदी दोन महिन्यांतच अवगत करत होता, तर काही विषयांमध्ये त्या अवगत करायला त्याला बराच वेळ लागत होता किंवा काही अडचणी येत होत्या. असे का होते, याचा थोडा विचार केल्यावर असे लक्षात आले की, गणितासारखा विषय शिकताना त्याला पुस्तक वापरायला आवडत होते, मात्र इतर विषय विशेष करून भाषा, परिसर विज्ञान शिकताना त्याला पुस्तकातील धडे वाचणे, व त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे कंटाळवाणे वाटत होते. हे असे का होत असावे, याचा विचार करताना सहजच आमचे लक्ष तो वापरत असलेल्या NCERT च्या पुस्तकात शिक्षकांसाठी दिलेल्या सूचनांकडे गेले.
©चेतन एरंडे
क्रमश:

Comments

Popular posts from this blog

आपण कसे वागायचे? भाग १ 🚀

समाजामध्ये प्रचलित असलेला मार्ग सोडून दुसरा मार्ग निवडण्यासाठी आपले मन कधीच सहजासहजी तयार होत नाही.   यामध्ये आपला खरंच काही दोष नाही.   आपला मेंदू हा आपल्या निर्णय घेण्याच्या सगळ्या व्यवस्थेची कंट्रोलरूम आहे.   या कंट्रोलरूमकडे जेव्हा कोणतीही माहिती येते, तेव्हा त्या माहितीचे "ऍनालिसिस" करून मेंदूला निर्णय घ्यायचा असतो.  हे ऍनालिसिस पूर्ण झाल्यावर निर्णय घेण्याआधी आपला मेंदू सगळ्यात आधी जर काय शोधत असेल, तर "रेफरन्स"!   आपल्या पूर्वजांनी, आपल्या आजूबाजूच्या लोकांनी अशा परिस्थितीत काय निर्णय घेतले यावरून आपल्या मेंदूत हे रेफरन्स तयार होतात. खरे तर या जगात टिकून राहण्यासाठी "भरवश्याचा मार्ग" निवडण्याची ही मेंदूच्या कामाची पद्धत माणसाला अनेकदा जीव वाचवण्यासाठी उपयोगी पडली असणार आहे, त्यामुळे आपल्या मेंदूने ही पद्धत स्वीकारली असावी.  आयटीमध्ये काम करणाऱ्या माणसांना हे रेफरन्स कसे वाचवतात हे वेगळे सांगायला नको!!  मात्र माणसाच्या आणि इतर प्राण्यांच्या बाबतीत एक महत्त्वाचा फरक आहे—तो म्हणजे आपण आपला "डिफेन्स मेकॅनिझम" हा काळानुसार अधिक "रिलायब...

आपण कसे वागायचे? भाग २ 🌱✨

दुसरी पायरी ही—आपण निसर्गाचे डिझाईन आहोत. 🌿 त्यामुळे आपल्या क्षमतेचा खरा अविष्कार, मॅनिफेस्टेशन , हे निसर्गाचे नियम, तत्त्व आणि प्रक्रिया "फॉलो" करून होणार आहे. 🔄💡 मी आधीच्या भागात उल्लेख केलेला अधिकचा "डिफेन्स मेकॅनिझम" हा आपल्या नैसर्गिक प्रेरणा "ओव्हरराईड" करण्यासाठी वापरायचा नाही. 🚫❌ तर आपले "नॅचरल डिझाईन" समजून घेत, त्या डिझाईनला साजेशी जीवनशैली अंगिकारण्याची ताकद मिळवण्यासाठी वापरायचा आहे. 🏋️‍♂️🌍 या जीवनशैलीमध्ये— 🍀 आपला आहार 👕 आपली वेशभूषा 💼 आपली उपजीविका 👶 आपल्या मुलांचे संगोपन आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपली शिकण्याची प्रक्रिया — केवळ रेफरन्सवर किंवा प्रचलित गोष्टींवर अवलंबून न राहता , निसर्गाने मला या गोष्टी करण्यासाठी कशा प्रकारे डिझाईन केले आहे हे ओळखणे आणि त्याप्रमाणे वागणे म्हणजेच "ब्रह्मविद्या" आहे, असे मला वाटते. 🌌📖 आणि हे ब्रह्मज्ञान झाले की आपोआपच आपल्याला— 😊 सुखाचा 🙏 समाधानाचा 🔗 आणि अस्तित्वाचा शाश्वत मार्ग दिसू लागतो. त्या मार्गावरून चालण्याचा आत्मविश्वास वाटतो. 🚀✨ ही सगळी ...

होमस्कूलिंग (स्व अध्ययन) व पालकांची भूमिका

होमस्कूलिंग (स्व अध्ययन) व पालकांची भूमिका आत्तापर्यंत मी मांडलेल्या अनेक अनुभवातून होमस्कूलिंग म्हणजे स्व-अध्ययन आहे व घरी राहून जे शाळेत शिकवतात, तेच शिकवणे, असा त्याचा अर्थ नाही, हे आपल्या लक्षात आले असेलच. होमस्कूलिंग या शब्दामुळे "घरी बसून शिकणे" असा   गैरसमज होऊ नये म्हणून इथून पुढे ब्लॉग वर व इतरत्र लिहिताना, मी केवळ स्व-अध्ययन हीच संज्ञा वापरणार आहे. स्व-अध्ययन करत असताना, मूल कसे शिकते, त्याच्या परीक्षेचे काय, तो समाजात कसा मिसळणार यावर माझ्या ब्लॉग वर मी व प्रीतीने आत्तापर्यंत आमचे अनुभव मांडायचा प्रयत्न केला आहेच. मात्र या प्रवासात या सगळ्याहून एका अत्यंत महत्वाची असलेल्या गोष्टीकडे आम्हाला तुमचे लक्ष वेधायचे आहे, ती म्हणजे या सगळ्या प्रवासात अपेक्षित असणारी पालकांची भूमिका. "शिकणे" ही माणसाला मिळालेली एक अत्यंत नैसर्गिक व मुलभूत प्रेरणा आहे. त्यामुळे प्रत्येक माणूस त्याची इच्छा असो वा नसो शिकत असतोच. "शिकणे" या प्रेरणेला किंवा प्रक्रियेला आपण शाळा, अभ्यासक्रम व पुस्तके यांच्याशी जोडल्यामुळे इतर सगळे "शिकणे" आपण शिकणे या...