होमस्कुलिंग व सोशलायजेशन - भाग २
या
पृथ्वीवर आपण जसे राहतो, तसे अनेक प्राणी, पक्षी, वनस्पती सुद्धा राहतात व त्यांना आपल्याइतकाच जगायचा अधिकार
आहे, हे विसरून शाश्वत जीवनशैलीऐवजी, गरज नसतानाही सतत संपत्ती गोळा करण्यासाठी पळणारी व "स्पर्धेच्या युगात" पुढे राहण्यासाठी गरज पडल्यास इतरांच्या पायात पाय घालणारी माणसे, आपण उठ सुठ
रोज ज्यांना शिव्या घालतो ते राजकारणी, ते नोकरशहा,
ते बेशिस्त वाहनचालक "सोशलाईज" आहेत, त्यांना समाजभान आहे,
असे तुम्हाला वाटते का?
"सगळे भारतीय माझे बांधव आहेत" हे शाळेत शिकूनही, जेंव्हा मोठी झाल्यावर हीच मुले जातीपातीवरून आपल्याच "भारतीय
बांधवांशी" भांडत बसतात, आपापल्या जातीचे झेंडे घेऊन मोर्चे काढतात, हे
बघितल्यावरही शाळेत गेल्याने सोशलायजेशन होते, यावर विश्वास ठेवावा का?
याचे कारण म्हणजे बसमधून शाळेत एकत्र येणे आणि जाणे म्हणजे केवळ सोशलायजेशन नाही तर, मी बसमध्ये
बसलेलो असताना जो उभा आहे, त्याला बसायला जागा देण्याचा माझ्या मनात येणे म्हणजे सोशलायजेशन आहे,
हे आपण विसरलो आहोत.
जसे
केवळ शाळेत गेल्यामुळे मुळे सोशलाईज होतात हे पूर्ण सत्य नाही, तसेच केवळ होमस्कुलिंग केल्याने मुले जगावेगळी बनतात, समाजाचे
आधार बनतात, हेही पूर्ण सत्य नाही. शाळा
हे जसे शिक्षणाच्या अनेक माध्यमांपैकी एक आहे, तसेच ते मुलांना
समाजभान येण्याच्या, सोशलाईज होण्याच्या अनेक माध्यमांपैकी एक (एकमेव नव्हे) माध्यम
आहे.
होमस्कुलिंग करत असताना, स्नेहला
समाजभान यावे यासाठी आम्ही त्याच्याशी समाजात घडत असलेल्या
चांगल्या, वाईट गोष्टींविषयी जेंव्हा
जेंव्हा गप्पा मारतो तेंव्हा आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमध्ये एक चांगला नागरिक म्हणून आपली भूमिका काय असली पाहिजे याविषयी
आवर्जून बोलतो. आपल्यापेक्षा वेगळी मते असणाऱ्या लोकांकडे असलेले चांगले गुण आपल्याला कसे घेता आले पाहिजेत, हे त्याच्या
लक्षात आणून देतो.
मित्राकडे
किंवा शेजाऱ्याकडे एखादी गोष्ट आहे म्हणून ती माझ्याकडेही असली
पाहिजे असा विचार करण्याऐवजी मला त्या गोष्टींची खरेच गरज आहे का, हे तपासून
बघितले पाहिजे हे त्याला समजावतो. अर्थात हे समजावणे केवळ उपदेशपर असून काहीही
उपयोग होत नाही, हे पक्के समजल्यामुळे, आम्ही घरात कोणतीही नवीन गोष्ट घेताना, आपण
ती का घेत आहोत, व आपल्याला त्याची खरेच गरज आहे का, हे एकत्र बसून ठरवतो. या जगात
वावरत असताना पैशाने विकत न घेता येणारे समाधान व आनंद आम्हाला जिथे जिथे आढळतो,
तिथे तिथे आम्ही स्नेह्ला मुद्दामून घेऊन जातो. पैशाच्या मागे न लागता, समाधानी व
आनंदी जीवन जगता येते, याची जिवंत उदाहरणे त्याला वेध सारख्या उपक्रमांना घेऊन जातो. अशा
लोकांचा त्याला सहवास मिळावा, त्याचे जीवन जवळून बघता यावे म्हणून आम्ही प्रयत्न
करतो.
स्पर्धेच्या
युगात टिकायचे असेल, तर
"स्पर्धा" कशी करायची हे शिकायची गरज नाही, तर स्वत:मध्ये डोकावून बघून माझा आनंद कशात आहे व माझ्या गरजा काय आहेत, हे समजून घेणे
जास्त महत्वाचे आहे. जर आपल्या
गरजा काय आहेत व आपला आनंद कशात आहे, हे आपल्याला इतरांशी तुलना न करता ओळखता आला विनाकारण होणारे खर्च
आपल्याला सहज टाळता येतील त्यामुळे उपजीविका
व जीविका या मध्ये होणारी ओढाताण सहज टाळता येईल. आपल्या क्षमता व गरजा यांचा योग्य मेळ घालता आला, तर स्पर्धेचा
तणाव जाणार नाही. स्पर्धाच नसल्यामुळे द्वेष, मत्सर यापासून आपली सुटका होईल. हे आमच्या
वागण्यातून त्याच्या लक्षात येईल, याची आम्ही काळजी घेतो. त्याची कुणाशीही स्पर्धा
नसल्यामुळे, कुणाशीही तुलना नसल्यामुळे, स्नेह समाधानी व आनंदी असल्याचे आम्हाला
जाणवते, व तो स्वत:च आनंदी असल्यामुळे, इतरांच्या भल्याचा विचार करताना, त्यांचे भले झालेले बघताना, त्याला कदाचित त्रास
होत नसावा व त्यामुळे तो पटकन सोशलाईज
होत असावा!
दिवाळीला
स्वत:हुन फटाके न वाजवण्याचा निर्णय, घरातील ज्या रूम मध्ये कोणीच नाही, त्या
रूमचे दिवे व पंखे बंद करण्याची सवय, हॉटेल मध्ये गेल्यानंतर जेवण आवडले किंवा नाही आवडले तर स्पष्टपणे
जाऊन सांगण्याचे धाडस, विमानाने प्रवास करताना पायलटशी बोलून थेट
विमान कसे चालते, हे समजून घेण्याचा केलेला प्रयत्न दोन
वर्ष टीव्ही शिवाय पुस्तकांच्या
व मित्रांच्या गराड्यात जगणे आणि
तो ज्या उपक्रमांना जातो, तेथे प्रत्येक उपक्रमाला नवीन नवीन मुले असतानाही त्यांच्याशी त्याची होत असलेली मैत्री, हे
आमच्यादृष्टीने त्याच्या समाजभानाचे व आमच्या प्रयत्नाचे मूल्यमापन आहे असे आम्ही समजतो. सुदैवाने आमच्या प्रयत्नांना
स्नेह्ची साथ मिळाल्याने आम्ही त्या मूल्यमापनात उत्तम गुण (इतरांपेक्षा जास्त म्हणून उत्तम नव्हे तर आम्हाला समाधान देणारे म्हणून उत्तम!) मिळवत आहोत!
एवढे
सगळे लिहिण्यामागचा उद्देश म्हणजे, शाळेत पाठवले की मुळे
सोशलाईज होतात, असे समजून मुलांना खऱ्या अर्थाने सोशलाईज होण्यासाठी पालकांनी ज्या गोष्टी करणे आवश्यक आहे,
त्या शाळेत जाणाऱ्या मुलांच्या पालकांच्या
नजरेतून निसटू नयेत व होमस्कुलिंग करत असताना पालकांनी मुलांना समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या, वेगवेगळ्या विचारधारेच्या लोकांशी व संस्थांशी
मुलांचा सहवास घडवून आणणे कसे आवश्यक आहे,
हे सांगणे हा होता. जर आपण हे
सगळे चिकाटीने केले, तर आपण मुलांना खऱ्या अर्थाने सोशलाईज करून या समाजाला एक चांगला नागरिक "भेट" म्हणून देऊ शकतो, असा मला पूर्ण विश्वास आहे.
स्नेहने
कालच बोलता बोलता एक प्रश्न विचारला, "बाबा, चांगला माणूस आणि वाईट माणूस यांच्यातला फरक कसा ओळखायचा. कारण
मला एक चांगला माणूस व्हायचे असेल, तर तो
फरक आधी काळाला पाहिजे, ना."
स्नेहला
पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा आम्ही तिघांनी मिळून प्रयत्न करणे एवढेच एक काम जरी आम्ही इथून पुढे केले, तरी स्नेह चे आपोआपच
सोशलायजेशन होईल, असे आता आम्हाला वाटू लागले आहे!
©चेतन एरंडे.
समाप्त.
कृपया होमस्कुलिंग व सोशलायजेशन - भाग १ परत प्रसिध्द करू शकाल का तो भाग वाचण्यासाठी मिळत नाहीये धन्यवाद .
ReplyDelete