३३ वर्षे बालकारणाचा व १० वर्षे राजकारणाचा अनुभव असलेल्या माधुरीताई सहस्त्रबुद्धे यांच्याशी झालेल्या संवादातील दहा महत्वाच्या गोष्टी!
टाईम मशीन - भाग ८
पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका आणि बालरंजन केंद्राच्या प्रमुख माधुरीताई सहस्रबुद्धे यांच्याशी सर्जनशील पालक समूहाच्या पालकांनी टाईम मशीन या उपक्रमात बालकारण व राजकारण या क्षेत्रातील करिअरविषयी गप्पा मारल्या. सुरुवातीला ताईनी त्यांच्या बालपणापासून ते आत्तापर्यंतचा प्रवास सांगितला. त्यांच्या सेशनमधील प्रत्येक मिनिट इतका माहितीपूर्ण होता कि संपूर्ण सेशनवर एक पुस्तक लिहून होईल!
त्यामुळेच मला त्या सेशनमधून ज्या दहा महत्वाच्या गोष्टी समजल्या त्या मी इथे मांडतोय.
१. ताईंच्या हरहुन्नरी , कार्यक्षम आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्वामागे त्यांच्या कुटुंबाचा, आई, वडिलांचा, आजी, आजोबांचा खूप मोठा वाटा आहे. हे सगळेच प्रचंड "ऍक्टिव्ह" असल्याने ताईंना आपण आजकाल मुलांना पाठवतो तशा वेगळ्या ऍक्टिव्हिटी सेंटरची गरजच भासली नाही! मुले ऍक्टिव्ह हवीत असे ज्या पालकांना वाटते, त्यांना स्वत;ला अधिक ऍक्टिव्ह व्हावे लागेल.
२. आपल्या मुलांशी वागताना सिग्नल सारखं वागलं पाहिजे. ग्रीन सिग्नल कधी दाखवायचा, रेड सिग्नल कधी दाखवायचा आणि येलो सिग्नल कधी दाखवायचा हे जमणे महत्वाचे आहे. एखादी गोष्ट गैरवर्तन आहे की नापसंत आहे हे ठरवता आलं की सिग्नल कसा लावायचा हे समजत.
३. मुलांची त्यांच्या मित्रांशी केलेली तुलना मुलांना त्रासदायक असते, एवढेच मला माहिती होते पण हि तुलना त्यांना त्या मित्रांपासून दूर घेऊन जाते. हे मला पहिल्यांदा समजले. त्यामुळे मी तरी इथून पुढे चुकूनही तुलना करणार नाही.
४. अपयश साजरे करता आले पाहिजे. बालरंजन केंद्राच्या मुलांचा एका सामन्यात पराभव झाल्यानंतर ताईंनी या मुलांचे अपयश साजरे करून कृतीतून धडा दिला होता.
५. मुलांबरोबर "शिकता" आले पाहिजे. ताईंनी त्यांचा मोठा मुलगा कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना आणि धाकटा बारावीला असताना पत्रकारितेचे शिक्षण घेतले.
६. मुलांचे मन रमवण्याची खटपट करणे हे पालकांचे काम नाही. प्रत्येकाला आपले मन रमवता आले पाहिजे.
७. बालपणी मुलांच्या मनात ठसलेली "स्वप्रतिमा" मुले पुढं जाऊन काय करणार हे ठरवते, त्यामुळे मुलांचे बालपण आनंदी व आत्मविश्वासपूर्ण असणे अतिशय गरजेचे आहे.
८. मुलांना आऊट "ऑफ द बॉक्स" विचार करायला लावण्यासाठी मेहनत घेण्यापेक्षा तीच मेहनत मुलांच्याभवती "बॉक्सच" कसे तयार होणार नाहीत हे बघण्यासाठी घेतली पाहिजे.
९. आपल्याला शिकताना ज्या गोष्टी कंटाळवाण्या वाटतात, नकोशा वाटतात, त्याच पुढे जाऊन आपल्यासाठी जास्त महत्वाच्या असल्याचे आपल्याला जाणवते, त्यामुळे आपण शिकण्याचा कंटाळा करता कामा नये. माधुरीताईंनी लौकिक शिक्षण संपल्यानंतर जवळपास दहा वेगवेगळ्या क्षेत्रात शिक्षण घेतले आहे.
१०. बालरंजन केंद्रात तुम्ही नक्की काय करता? असं विचारल्यावर ताई म्हणाल्या "आम्ही आनंदाची निर्मिती करतो" . आनंद निर्माण करतो आणि तो इतरांना मनसोक्त वाटतो. ताई म्हणाल्या तसं २१ व्या शतकातील सगळ्यात महत्वाचे कौशल्य कोणते असेल तर ते म्हणजे आनंदी राहणे व आनंद निर्माण करणे.
त्यामुळेच जगभरातील विद्यापीठांनी "सायन्स ऑफ हॅपिनेस" चे स्वतंत्र विभाग निर्माण केले आहेत तर हे कौशल्य वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या रिपोर्टनुसार भविष्यातील मागणी असणाऱ्या कौशल्यांचा यादीत नंबर एक वर आहे!
आपल्या अतिशय व्यस्त कार्यक्रमातून ताईंनी सर्जनशील पालक समूहासाठी दीड तास देऊन पालकत्वाच्या प्रवासातील आनंदाची पायाभरणी केली. त्याबद्दल त्यांचे समूहाकडून आभार, त्याचबरोबर आपल्या व्यस्त दिनक्रमातून या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल पालकांचे देखील मनापासून आभार...
चेतन एरंडे.
हा कार्यक्रम ७ मे २०२० रोजी ऑनलाईन झाला होता.
The story of Madhuritai is an outstanding example of life style of an ideal mother, home maker, educationist social worket,politician with conscience...
ReplyDeleteIt's very useful information
ReplyDeleteThe above is by Raghunath Natu. I am residing on Bhakti Marg, off Law College Road & I know Madhuritai, her work for the betterment if society for last 10 years & more.
ReplyDelete